व्यावसायिक गॅसच्या तुटवड्यामुळे उद्योगांवर संकट – तातडीने पुरवठा वाढवावा : AMCCIE ची सरकारकडे मागणी-राजेश अग्रवाल
पुणे : इराण–अमेरिका युद्धामुळे जागतिक ऊर्जा पुरवठा साखळीवर परिणाम झाला असून त्याचा परिणाम भारतातही दिसून येत आहे. देशभरात कमर्शियल LPG व औद्योगिक गॅसचा तुटवडा निर्माण होत असून त्याचा मोठा फटका विविध उद्योग, हॉटेल-रेस्टॉरंट व्यवसाय, फूड प्रोसेसिंग उद्योग, तसेच लघु व मध्यम उद्योगांना बसत आहे.
अग्रवाल मारवाडी चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड एज्युकेशन (AMCCIE) चे राष्ट्रीय अध्यक्ष राजेश अग्रवाल यांनी या गंभीर परिस्थितीबाबत चिंता व्यक्त करत सांगितले की, गॅसच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे अनेक उद्योगांचे उत्पादन प्रभावित होत असून काही उद्योगांवर कामकाज बंद करण्याची वेळ येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
जर ही परिस्थिती लवकर सुधारली नाही, तर अनेक उद्योगांना उत्पादन कमी करावे लागेल किंवा तात्पुरते बंद करावे लागेल. त्यामुळे लाखो कामगारांच्या रोजगारावर संकट निर्माण होईल आणि देशाच्या अर्थव्यवस्थेवरही त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो.
भारत “विकसित भारत” या उद्दिष्टाकडे वेगाने वाटचाल करत असताना उद्योगांचे उत्पादन आणि सातत्य टिकून राहणे अत्यंत आवश्यक आहे. उद्योग हे देशाच्या आर्थिक प्रगतीचे व रोजगार निर्मितीचे प्रमुख आधारस्तंभ आहेत.
AMCCIE ने केंद्र व राज्य सरकारकडे पुढील मागण्या केल्या आहेत :
उद्योगांसाठी कमर्शियल LPG व औद्योगिक गॅसचा पुरवठा तातडीने वाढवावा.
घरगुती व औद्योगिक क्षेत्रासाठी समतोल वितरण व्यवस्था सुनिश्चित करावी.
पुरवठा सुरळीत राहण्यासाठी पर्यायी आयात स्रोत व आपत्कालीन उपाययोजना कराव्यात.
बाजारातील काळाबाजार व कृत्रिम तुटवडा रोखण्यासाठी कडक कारवाई करावी.
उद्योग बंद पडू नयेत, लाखो रोजगार सुरक्षित राहावेत आणि देशाची अर्थव्यवस्था मजबूत राहावी यासाठी सरकारने तातडीने ठोस पावले उचलावीत, असे आवाहन AMCCIE तर्फे करण्यात आले आहे.

संपादक : कुमार कुलकर्णी





