कलांमधून मिळते जीवन जगण्याची उमेद : डॉ. संगीता बर्वे
पुणे : आयुष्य कितीही गुंतागुंतीचे असले तरी कलांच्या माध्यमातून जीवन जगण्याची उमेद मिळते, जीवनातील तोल सांभाळणे शक्य होते त्याचप्रमाणे आपले व्यक्तीमत्वही प्रगल्भ होत जाते, असे प्रतिपादन साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ कवयित्री, डॉ. संगीता बर्वे यांनी केले.
रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे मराठीतील आद्य शायर भाऊसाहेब पाटणकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दिल्या जाणाऱ्या पुरस्काराने प्रसिद्ध कवयित्री, गझलकार प्राजक्ता पटवर्धन यांचा आज (दि.२८) डॉ. संगीता बर्वे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. त्या वेळी डॉ. बर्वे बोलत होत्या.
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भाऊसाहेब पाटणकर यांचे नातजावई, अभिनेते किरण यज्ञोपवीत यांची प्रमुख उपस्थिती होती. रंगत-रंगत प्रतिष्ठाचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर, मैथिली आडकर मंचावर होते. सन्मानपत्र, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते.
प्राजक्ता पटवर्धन यांच्या गझल लिखाणाचे कौतुक करून डॉ. संगीता बर्वे पुढे म्हणाल्या, भाऊसाहेब पाटणकर यांनी आपल्या शायरीतून जीवनाचा आशयही सांगितला आहे.
रोज काही गुजगोष्टी करते माझी गझल’ या ओळी उद्धृत करून सत्काराला उत्तर देताना प्राजक्ता पटवर्धन म्हणाल्या, सिद्धहस्त गझल लेखकांच्या मार्गदर्शनाखाली गझल लेखन या प्रांतातील शिक्षण अजून सुरू आहे. शिकण्याचा प्रवाह हा वाचन, लेखनातून समृद्ध होत आहे.
किरण यज्ञोपवित म्हणाले, गझल हा प्रकार मराठीत रुजावा यासाठी अनेक प्रतिभावान लेखकांनी भगीरथ प्रयत्न केले. त्यात सर्वात अग्रभागी भाऊसाहेब पाटणकर यांचे येते. भाऊसाहेब पाटणकर यांची गझल म्हणजे जीवनाविषयीचे संखोल चिंतनच म्हणावे लागेल.
सुरुवातीस ॲड. प्रमोद आडकर यांनी पुरस्काराविषयी माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व मानपत्राचे वाचन वैजयंती आपटे यांनी केले.
का र्यक्रमाच्या उत्तरार्धात आयोजित गझल मुशायरा कार्यक्रमात प्रमोद खराडे, नचिकेत जोशी, योगेश काळे, सुनिती लिमये, स्वाती दाढे, तनुजा चव्हाण, स्वप्नील पोरे, चैतन्य दीक्षित, चैतन्य कुलकर्णी, वासंती वैद्य यांचा समावेश होता. सूत्रसंचालन प्राजक्ता वेदपाठक यांनी केले

संपादक : कुमार कुलकर्णी





